पुणे : ‘विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात माणसांमधील संवाद कमी झाला आहे. माणसे एकमेकांशी बोलण्यापेक्षा मोबाइल आणि त्यासारख्या इतर तंत्रज्ञानावर अधिक वेळ घालवत आहेत. संवाद साधण्यासाठी शब्दांपेक्षा आज चित्र आणि दृश्यांचा अधिक वापर होत असून, समाजाची वाटचाल शब्दहीन संवादाकडे होत आहे,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक, भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी बुधवारी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कै. ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानात ‘माध्यमांची बदललेली भाषा’ या विषयावर डॉ. देवी बोलत होते. संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी आणि खजिनदार सुनील जगताप या वेळी उपस्थित होते.
डॉ. गणेश देवी म्हणाले, ‘आज तरुणांना नोकरी नसेल, तर त्याचा राग येत नाही; परंतु इंटरनेटचा वेग कमी झाला तर त्याचा राग येतो. हा मानसिकतेचा नव्हे, तर समाजाच्या बदलत्या गरजांचा परिणाम आहे. संवाद साधण्यासाठी शब्दांची गरज कमी भासत आहे. त्यामुळे समाजाचीही भाषा बदलत आहे, याचेच प्रतिबिंब आपल्याला रोजच्या जगण्यामध्ये आणि वर्तमानपत्राच्या भाषेमध्येही दिसत आहे. वर्तमानपत्रांपुढे हे मोठे आव्हान आहे. वर्तमानपत्रात दैनंदिन प्रसिद्ध होणाऱ्या भाषेत किती चुका असतात, यापेक्षा त्यात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, विश्लेषण हे किती निष्ठेने लिहिले आहे, ते महत्त्वाचे आहे.’
‘पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे; मात्र जगभरातील लोकशाहीचे स्वरूप बदलले आहे. वर्तमानपत्रांची आर्थिक नीतीही बदलली आहे. या बदललेल्या परिस्थितीत पत्रकारितेची निष्ठा टिकून राहणे महत्त्वाचे आहे,’ असेही डॉ. गणेश देवी यांनी नमूद केले.